वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
एक हजार लिटर दुधामध्ये तब्बल ५०० लिटर रासायनिक पाणी व शॅम्पूसदृश पदार्थ मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत समोर आली आहे. दूध भेसळीचा मुद्दा विधानसभेत सातत्याने उपस्थित करणारे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यभर सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली.
प्राथमिक तपासानुसार, ५०० लिटर शुद्ध दुधात सुमारे ३०० लिटर, तर १,००० लिटर दुधात तब्बल ५०० लिटर रासायनिक पाणी मिसळले जात होते. दुधाचे प्रमाण आणि घट्टपणा वाढवण्यासाठी वास न येणारा शॅम्पूसदृश पदार्थ, दूध पावडर आणि विविध घातक रसायनांचे मिश्रण वापरून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
हे भेसळयुक्त दूध नामांकित दुग्धव्यवसाय कंपन्यांना पुरवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दुधापासून तयार होणारे दुग्धजन्य पदार्थ लहान मुलांसह सर्वसामान्य ग्राहकांच्या आहारात पोहोचत असल्याने या प्रकारामुळे गंभीर आरोग्याचा धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने सुमारे ३६ तास विशेष मोहीम राबवून राज्यातील २३ ठिकाणांवरील दूध डेअऱ्यांवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात दूध, खवा, रासायनिक पदार्थ आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभेत दूध भेसळ, शीतपेयांवरील नियंत्रण आणि अन्नसुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी करणारे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यानंतरच राज्यभर ही विशेष तपास मोहीम सुरू झाल्याची चर्चा असून, या कारवाईमुळे भेसळखोरांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























