वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड | शहरातील उड्डाणपूल चौक परिसरात वारंवार होत असलेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी दौंड शहरातील महिला भगिनींनी दौंड तहसीलदारांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. ७ जुलै २०२६ रोजी उड्डाणपूल चौक परिसरात सारिका कंकाळे यांचा अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेने गंभीर अपघात झाला. परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने संबंधित वाहनाचा शोध घेणे कठीण झाले. तसेच अपघातानंतर तात्काळ मदत मिळण्यास व रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यापूर्वीही तुकडोजी विद्यालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एका आठ वर्षीय चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने दौंड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उड्डाणपूल चौक परिसरात तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात उड्डाणपूल चौक हा पुणे, अहिल्यानगर आणि बारामती या प्रमुख मार्गांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असल्याचे नमूद केले. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, शाळा परिसरातील सूचना फलक तसेच इतर आवश्यक सुरक्षा सुविधा नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
यावेळी उड्डाणपूल चौक परिसरात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत,प्रमुख चौकात व उड्डाणपूल परिसरात वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावण्यात यावेत,शाळा परिसर – सावकाश वाहन चालवा व “School Ahead” असे सूचना फलक बसविण्यात यावेत,तसेच आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर आणि झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करण्यात यावी,अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकांचे फलक लावण्यात यावेत,वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी नियमित जनजागृती मोहीम राबविण्यात यावी,उड्डाणपूल चौक परिसरातील रस्ते सुरक्षेचे सर्वेक्षण करून आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात याव्यात.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी महिलांनी केली.
यावेळी मनीषा मिलिंद संसारे, सारिका महावीर गरुड, सिमरन प्रेम खवळे, रमिला कातकडे, निना जोसेफ, कंचनमाला धिंडे, संगीता मोरे, माधुरी ढवळे, रोहिणी ढवळे, जयश्री माने आणि सुनिता वांटे उपस्थित होत्या.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























