वृत्तवेध मarathi /संदिप बारटक्के
दौंड (जि. पुणे) – महिलांच्या सक्षमीकरणासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. आरती कांबळे राज्य उपप्रमुख यांनी केले.
भारतीय मानवधिकार संस्था, नवी दिल्ली यांच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या नवीन सदस्य नोंदणी अभियानांतर्गत दौंड येथे कार्यक्रम पार पडला. शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दौंड येथील गेस्ट हाऊस येथे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सौ. कांबळे म्हणाल्या की, देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना महिला, बालक व वृद्धांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या घटनात्मक हक्कांची व कायद्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. जनजागृती आणि एकजुटीच्या माध्यमातूनच अशा अन्यायकारक घटनांना आळा घालता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे त्यांनी सांगितले की, भारतीय मानवधिकार संस्था सतत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असून, अधिकाधिक नागरिकांनी सदस्यत्व घेऊन या चळवळीत सहभागी व्हावे.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “अन्याय करणाऱ्याइतकाच अन्याय सहन करणारा समाजही जबाबदार असतो.” त्यामुळे संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुभम कदम, सलिमा शेख, सलीम कुरेशी, फरजाना बागवान, आसमा शेख यांच्या माध्यमातून अनेक नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप उत्साहात करण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























