वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड मतदारसंघाच्या पूर्व भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि विकासाला चालना देणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. मतदारसंघातील प्रमुख मार्गांच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) माध्यमातून सुमारे २४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै २०२६ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात या निधीला मंजुरी देण्यात आली असून, आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित मानले जात आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत दौंड मतदारसंघातील सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या प्रमुख मार्गांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या रस्त्यांमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आलेगाव–बोरीबेल–मलठण–स्वामी चिंचोली मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ पर्यंत मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मलठण–राजेगाव–भिगवण स्टेशन–भिगवण मार्ग विकसित करून तो राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे.
हा रस्ता दौंडच्या पूर्व भागातील गावांना थेट पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आलेगाव, बोरीबेल, काळेवाडी, मलठण, राजेगाव तसेच इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन आणि भिगवण ही गावे अधिक वेगवान व सुरक्षित वाहतुकीच्या जाळ्यात समाविष्ट होतील.
या प्रकल्पामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची बाजारपेठेत जलद वाहतूक करता येणार असून वाहतूक खर्चातही बचत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी पुणे-सोलापूर महामार्गावरील शहरांमध्ये पोहोचणे अधिक सोपे व सुरक्षित होणार आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दौंडचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय – आमदार राहुल कुल
“दौंड मतदारसंघातील पूर्व भागातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास आता कायमचा दूर होणार आहे. या कामासाठी २४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मी आभार मानतो. कामाचा दर्जा उत्कृष्ट राखून ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
या निधीमुळे दौंडच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, ग्रामीण भागाच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























