वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड | शहरातील प्रलंबित नागरी समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, आरपीआय (आठवले गट), पीआरपी (कवाडे गट) व मित्रपक्ष यांच्या वतीने गटनेते योगेश कटारिया यांच्या नेतृत्वाखाली आज दौंड नगरपालिकेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या कामकाजात होणाऱ्या दिरंगाईबाबत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना जाब विचारण्यात आला.
आंदोलनादरम्यान दौंड शहरातील विविध मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी त्वरित गतिरोधक बसविणे, तसेच पाणीपुरवठा विभागात कामगारांची संख्या वाढवून रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
याशिवाय प्रभाग क्रमांक १ ते १३ मधील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करून लाईट विभागात आवश्यक मनुष्यबळ वाढवावे, नगरसेवकांनी दिलेल्या पत्रांवर लेखी उत्तर द्यावे, तसेच मोकाट जनावरे पकडण्याचे टेंडर रद्द केल्याचा विषय आगामी सर्वसाधारण सभेत चर्चेस घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी सफाई कामगारांनी पूर्ण वेळ ड्युटी बजावावी, नगरपालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी लोकप्रतिनिधींना व नागरिकांना योग्य सहकार्य करीत नसल्याचा आरोप करत त्याबाबत सुधारणा करण्याची मागणी केली. तसेच नगरपालिकेतील रिक्त पदे तातडीने भरावीत, लाईट विभागासाठी आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध करून रखडलेली कामे पूर्ण करावीत, शहरातील बंदिस्त चेंबरची स्वच्छता तातडीने करावी, विविध विकासकामांच्या ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहावेत, तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक ठिकाणी बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून द्यावेत, अशाही मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून संबंधित विषयांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
धरणे आंदोलनात नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, आरपीआय (आठवले गट), पीआरपी (कवाडे गट) व मित्रपक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























