✍️ अख्तर काझी
दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील राष्ट्रपुरुषांच्या स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. भारत माता की जय…… वंदेमातरम च्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमला होता. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासो पवार यांच्यासह भाजपा, नागरिक हित संरक्षण मंडळ, आर. पी. आय., पी.आर.पी. आघाडीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. येथील संत गाडगेबाबा- संविधान स्तंभ चौकामध्ये रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार राहुल कुल यांनी दौंडकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राहुल कुल म्हणाले की, देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आज देशभरामध्ये स्वातंत्र्याच्या सन्मानार्थ आणि ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, तिरंगा रॅलीच्या माध्यमातून होत आहे. आज तालुक्याच्या वतीने घेण्यात आलेल्या तिरंगा रॅलीचे आयोजन अगदी कमी वेळेत झाले तरी सर्व कार्यकर्त्यांनी व्यस्त कार्यक्रमांमधून सुद्धा या तिरंगा रॅलीसाठी वेळ काढला आणि आपल्या देशाप्रती आपले असणारे प्रेम आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्या विषयी असणारी कृतज्ञता आज व्यक्त केलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या स्वातंत्र्याविषयीच्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण करण्यासाठी एक चांगला नागरिक म्हणून आपली भूमिका या लोकशाही देशामध्ये बजावण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचे स्मरणच अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न आपण सगळेच करत असतो. लोकशाहीने आपल्या सगळ्यांना अधिकार दिले, त्याचबरोबर अधिकार देत असताना आपल्याला काही कर्तव्याची सुद्धा जाणीव असणे आवश्यक आहे. या लोकशाही प्रति असणारे आपले कर्तव्य अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून आपल्या सगळ्यांना निश्चितपणे पुन्हा एकदा त्याची जाणीव होते. त्यामुळे आज आपण सगळेजण देशाप्रती असणारे प्रेम,लोकशाही विषयी असणारा आदर आणि ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले त्यांच्याविषयी असणारी कृतज्ञता या भावनेतून आज तिरंगा रॅली चा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहोत. याच कर्तव्य भावनेतून पुढच्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये खऱ्या लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून आपण आपले कर्तव्य पार पाडूया असेही राहुल कुल म्हणाले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























