वृत्तवेध मarathi — संदिप बारटक्के
दौंड : दौंड स्थानकावरून सुटणारी हुतात्मा एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12158) ही गाडी रेल्वे जिन्यापासून बऱ्याच पुढे उभी केली जात असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दररोज सकाळी दौंडहून – पुण्याकडे जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना याचा फटका बसत असून, विशेषतः वयोवृद्ध नागरिक, रुग्ण आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिन्यापासून लांब उभ्या असणाऱ्या रेल्वेपयर्यंत प्रवाशांना लांब अंतर चालत जावे लागत असल्याने गैरसोय वाढली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळही वाया जातो आणि सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो आहे.
दौंड–पुणे–दौंड प्रवासी संघाने या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. गाडी योग्य ठिकाणी थांबवावी किंवा पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रवाशांच्या सोयीपेक्षा प्रशासनाची बेफिकिरीच अधिक दिसून येत असल्याने हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी रेल्वे प्रवाशांकडून आता जोर धरू लागली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























