वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के
दौंड | प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दररोज १०० ग्रॅम आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम तांदूळ शिजविण्याची अट असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थी एवढा भात खात नसल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर तांदळाचे प्रमाण निम्म्याने कमी करून त्यामध्ये पालेभाज्या व विविध कडधान्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक आहारात वाढ करण्यात यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. यासाठी कोणतीही अतिरिक्त आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता नसून, तांदळाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी पौष्टिक घटकांचा समावेश वाढविणे शक्य असल्याचे पत्रात म्हटले आहे.
ही योजना अधिक प्रभावी व विद्यार्थीकेंद्रीत पद्धतीने राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत अंमलबजावणी करावी तसेच ‘मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना’ सुरू करून दर्जेदार व संतुलित आहार पुरविण्याची व्यवस्था करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम कांबळे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथील संचालकांना दिलेल्या पत्रातून ही मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यदृष्ट्या सर्वांगीण विकासासाठी आहारामध्ये पोषणमूल्यांना प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























