वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पी.एम.पी.एम.एल.) बस सेवा हडपसर ते पाटसपर्यंत सुरू असून या सेवेचा अनेक सामान्य प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. मात्र ही बस सेवा दौंड शहरापर्यंत, विशेषतः दौंड रेल्वे स्टेशनपर्यंत सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने आमदार राहुल कुल यांच्याकडे करण्यात आली आहे.
सध्या पुण्याकडे जाणाऱ्या अनेक शालेय विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, नोकरदार, व्यापारी तसेच सामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दौंड रेल्वे स्टेशनवरून सकाळी ८.२० वाजता सुटणाऱ्या बारामती डेमो रेल्वेनंतर पुण्याकडे जाण्यासाठी दुसरी रेल्वे उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेल्या अनेक गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.
दौंड शहरासह सिध्दटेक, देऊळगाव राजे, शिरापूर, लिंगाळी, सोनवडी, काष्टी, श्रीगोंदा या परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांना पुण्याकडे जाण्यासाठी एस.टी. बसची वाट पाहावी लागते. अनेकदा या बस पूर्ण भरून येत असल्याने प्रवाशांना जागा मिळत नाही. तसेच काही बस बिरोबावाडी येथे नाश्त्यासाठी अर्धा ते एक तास थांबत असल्याने प्रवाशांचा पुढील प्रवास उशिरा होतो.
रेल्वेतील जनरल डब्यांची संख्या कमी झाल्यामुळे जनरल डब्यांची क्षमता साधारण १५० ते २०० प्रवाशांची असताना हजारो तिकीटे विकली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सामान्य प्रवाशांना एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करणे कठीण होत आहे.
या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हडपसर ते पाटसपर्यंत धावणारी पी.एम.पी.एम.एल. बस सेवा दौंड शहरापर्यंत, विशेषतः रेल्वे स्टेशनपर्यंत सुरू केल्यास शालेय विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, नोकरदार, व्यापारी व सामान्य प्रवाशांची मोठी सोय होईल. तसेच अर्ध्या तासाच्या अंतराने बस उपलब्ध झाल्यास पी.एम.पी.एम.एल.च्या उत्पन्नातही वाढ होईल, असे संघटनेने नमूद केले आहे.
या मागणीवेळी प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री, दौंड शहर अध्यक्ष कलीम तांबोळी, रेणुका चव्हाण, शेहनाज शेख, राजू गायकवाड, राजू कृपलानी, शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष गणेश पवार तसेच रेल्वे प्रवासी, विद्यार्थी व व्यापारी उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























