✍️ अख्तर काझी
दौंड: धौम्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दौंड नगरीतील दौंडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य हनुमान मंदिरात श्री चैतन्य हनुमान, श्री दत्त महाराज, जरीआईमाता, मरीआईमाता आणि श्री वेताळ महाराज यांच्या मूर्तींचा पुनः प्रतिष्ठापना सोहळा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने व धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती दौंड गावचे पाटील व पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे तसेच माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी दिली.
लोकसहभाग व लोकवर्गणीतून मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम २४ मार्च २०२४ सुरू झाले असून २४ आगस्ट २०२६ रोजी पुर्ण झाले. त्यामध्ये श्री चैतन्य हनुमान मंदिरास, तसेच श्री सुसज्ज आकर्षक सभामंडप संपूर्ण मंदिर परिसराला संरक्षक भिंत, कुस्ती आखाडा व बैठक व्यवस्था ( स्टेडियम), संपूर्ण परिसरात पेव्हर ब्लॉक, बाग विकसित करणे, इ कामांचा समावेश आहे. सदरचे काम तत्कालीन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री स्व अजितदादा पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून दिल. या कामासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या पाठपुरावा केला होता.
श्री चैतन्य हनुमान मंदिर हे दौंड शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक अतिशय प्राचीन व ऐतिहासिक श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. अनेक पिढ्यांपासून दौंडकरांची या मंदिरावर अढळ श्रद्धा असून, विविध धार्मिक उत्सव, सण-समारंभ आणि पारंपरिक विधींमध्ये मंदिराला विशेष स्थान आहे. या प्राचीन मंदिरातील देवतांच्या मूर्तींचा पुनः प्रतिष्ठापना सोहळा होत असल्याने दौंडकरांसाठी हा धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने दौंड गावगाड्यातील सर्व मंडळी, विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर तसेच भाविक एकत्र येऊन हा कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात पार पाडणार आहेत. गावातील सर्व घटकांनी एकत्र येऊन धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा हा प्रयत्न असून, या माध्यमातून दौंडच्या सांस्कृतिक व धार्मिक वारशाचे जतन करण्याचा संदेशही दिला जाणार आहे.
रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पुनः प्रतिष्ठापना महापूजा व धार्मिक विधी संपन्न होतील. विविध मंत्रोच्चार, पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देवतांच्या मूर्तींची विधिवत पुनः प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर परिसराची विशेष सजावट करण्यात येणार असून, भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच सायंकाळी ५ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दौंड शहर व परिसरातील सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून देवतांचे दर्शन घ्यावे, महापूजेत सहभागी व्हावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दौंडच्या प्राचीन धार्मिक परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणण्यासाठी हा सोहळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा संगम असलेल्या या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यास दौंडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन वीरधवल जगदाळे व इंद्रजित जगदाळे यांनी केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























