अख्तर काझी
दौंड : बारामती या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्यालय निश्चितीकरण करताना पुणे जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात समाविष्ट असलेले दौंड तालुका बारामती कार्यालयाच्या क्षेत्रात समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय संपूर्ण दौंड तालुक्यावर अन्याय करणारा व त्यांच्या मूलभूत हक्कावर तसेच शासन सुविधा प्राप्त करून घेण्याच्या मर्यादेवर आघात आहे अशी हरकत दौंड नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळ ,भाजपा, आर.पी.आय .,पी.आर.पी. आघाडीचे गटनेते योगेश कटारिया यांनी घेतली आहे.
कटारिया यांनी या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या हरकत व सूचना अर्जात असे नमूद केले आहे की,
मा. सहसचिव महसूल व वन विभाग मंत्रालय( महाराष्ट्र शासन) यांनी पुनर्रचना व प्रस्तावित केलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय बारामती या नवीन कार्यालयाचे मुख्यालय व कार्यालय निश्चितीकरण करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती व नकाशे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. यावर मी योगेश कटारिया, नगरपालिकेतील आघाडीचे सर्व नगरसेवक, दौंड शहरातील विविध पक्ष, संघटनेच्या वतीने हरकत व सूचना अर्ज दाखल करत आहे.
वास्तविक पाहता सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सर्व सुख सुविधा या सुलभ व सोयीच्या दृष्टीने प्राप्त करून देणे हे शासनाचे आद्य कर्तव्य असताना सदर निर्णयाने संपूर्ण दौंड तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना भौगोलिक, आर्थिक, नैसर्गिक ,दळणवळणाच्या दृष्टीने सुविधांच्या बाबतीत गैरसोयीचे आहे.
दौंड हे रेल्वेचे जंक्शन असून भविष्यात ते पुण्याचे उपनगर म्हणून घोषित होणार असून रेल्वेच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना पुणे या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत सोयीचे असून त्यामुळे दौंड तालुक्याचा समावेश पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयातच असावा अथवा सदरील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे दौंड मध्ये करण्यात यावे. बारामती शहर हे दौंड तालुक्याला गैरसोयीचे असून उलटा प्रवास करावा लागेल.
दौंड तालुक्याची भौगोलिक सीमा पाहिली असता पुणे शहरापासून दौंड तालुक्याची सुरुवात अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून सुरू होते, तसेच तालुक्यातील राहू ,पिंपळगाव बेटा असून पुणे शहराला जोडणारा म्हणून वाघोली मार्ग आहे या बेटातील जवळपास 40 वसुली गावांचा पूर्वापार संपर्क व अस्तित्व पुणे शहराशी आहे त्यामुळे त्यांना तर बारामती हे ठिकाण अत्यंत गैरसोयीचे होणार आहे.
दौंड शहरातील व तालुक्यातील व्यापारी वर्ग, नोकरदार व सर्वसामान्य नागरिक यांनी आपल्या पाल्यांच्या भविष्याच्या दृष्टीने व उद्योग व्यवसायाच्या कल्पनेने पुण्यामध्ये समांतर सुविधा घेण्याचे अनेक वर्षापासून सुनिश्चित केले असून पुणे कक्षेतून दौंड तालुका वगळल्यास त्यांचे सर्व नियोजन विस्कळीत होऊन गोंधळाची स्थिती निर्माण होणार आहे. दौंड तालुका व शहर हे पूर्वापार रेल्वे व राज्य राखीव पोलीस दल ( दोन गट) त्याचप्रमाणे नानविज येथे राज्य राखीव पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांचे प्रशिक्षण केंद्र असून पुणे ,मुंबई येथील कार्यालयाशी त्यांना सहज सुविधा उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांचे पुणे विभागीय ऑफिस हे पुण्यात असल्यामुळे त्यांना इतर शासनाच्या कार्यालयांबरोबर सर्व सुविधा संयुक्तरीत्या प्राप्त होत आहेत. बारामती या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये दौंड तालुक्याचा समाविष्ट केल्यास त्यांना शासकीय कार्यालयाचा वापर करण्यासाठी दोन शहराचा वापर करावा लागेल हे त्यांना गैरसोयीचे आहे. पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळक, सावरकर, चाफेकर बंधू या महान स्वातंत्र्यवीरांचे पुणे शहराशी नाते असून दौंड तालुका पुणे जिल्ह्यात असणे व दौंड तालुक्याचे महसुली समाविष्ट पुणे जिल्हा अधिकार कार्यालयात असणे यामध्ये दौंडकारांचे भावनिक व आपुलकीचे नाते आहे. पुणे जिल्ह्यामध्ये दौंड शहर असणे व पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज करणे हे दौंड तालुक्याला अभिमानाची व स्वाभिमानाची भावना जोपासते. यापूर्वी देखील प्रशासनाच्या दृष्टीने अनेक कार्यालय राजकीय दबावात भौगोलिक दृष्ट्या व दळणवळणाच्या दृष्ट्या दौंड शहरांमध्ये करणे क्रमप्राप्त असताना ते कोणत्याच दृष्टीने सोयीच्या नसलेल्या बारामती शहरात प्रस्तावित केलेले आहेत, हे दौंड तालुक्यातील नागरिकांवर अन्याय करणारे असून ही भावना गेली 50 ते 60 वर्षापासून दौंड तालुक्यातील नागरिकांच्या मनामध्ये खोलवर रुजली असून दौंड तालुक्याचे पुणे जिल्ह्याशी असलेले अस्तित्व संपविण्याचा हा राजकीय घाट असून याचा भविष्यात मोठा उठाव व बंड होऊ शकतो.
अशा विविध कारणे दौंड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी मोलमजूर, सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग यांच्या भावनांचा विचार केला असता व त्यांची मानसिकता पाहिली असता दौंड तालुका हा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याशी संलग्न असावा अथवा आम्ही सूचित केलेल्या सुचनान्वये प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करणे गरजेचे असल्यास ते दौंड शहरात करावे.
सदरील हरकत व सूचना अर्ज याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दौंड तालुका हा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याशी संलग्न असावा अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या हरकत व सूचना अर्जावर दौंड नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजपा, आरपीआय, पीआरपी विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या सह्या आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























