वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के
दौंड : दौंड नगरपरिषदेच्या हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून त्यांच्या सुरक्षित संगोपनासाठी काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी अक्षय रमेश वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड नगरपरिषदेमार्फत किरण डिस्ट्रीब्यूटर या एजन्सीस 29 सप्टेंबर 2025 रोजी कार्यादेश देण्यात आला होता. या अंतर्गत शहरातील मोकाट जनावरे (गाय, बैल इ.) पकडून त्यांचे सुरक्षित संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीवर सोपविण्यात आली होती. सदर एजन्सीने पकडलेले गोवंश श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट, धायगुडेवाडी (बोरीपार्धी, चौफुला) येथे ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, तक्रारीनुसार काही कालावधीनंतर संबंधित एजन्सीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गोवंश इतर ठिकाणी हलविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, शिवशंभी गौशाळा ट्रस्ट, पुणे येथे जनावरे पाठविण्यात आल्याचा उल्लेख असून ही गोशाळा सध्या कार्यरत नसल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत 12 एप्रिल 2026 रोजी संबंधित गोशाळेशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ 37 गोवंश ताब्यात घेतल्याचे सांगितले. उर्वरित जनावरे इतरत्र दिल्याचेही त्यांनी कबूल केल्याने या प्रकरणात संशय अधिकच गडद झाला आहे.
तक्रारदाराने पुढे म्हटले आहे की, एजन्सीकडून सादर करण्यात आलेली बिले, गोशाळांचे दाखले व प्रत्यक्ष गोवंश संख्या यामध्ये मोठी तफावत आढळते. तसेच, नगरपरिषदेच्या अकाउंट विभागाकडे सादर केलेल्या आकडेवारीतही विसंगती दिसून येते. यामुळे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर पकडलेले गोवंश चार महिन्यांनंतर मूळ मालकांना परत दिल्याचे खोटे दाखले तयार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, काही गोवंश कत्तलीसाठी विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून यामुळे पशुसंवर्धन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले आहे.
या पार्श्वभूमीवर तक्रारदाराने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे काम स्थगित करावे, बिले थांबवावीत आणि दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे दौंड शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























