वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे-पाटील यांची निवड झाल्याने दौंड तालुक्याच्या राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासाच्या अपेक्षांना आता नवी दिशा मिळणार असल्याची भावना दौंड शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यापूर्वी “बारामती झकास, दौंड भकास” अशी टीका वारंवार ऐकायला मिळत होती. मात्र, आत्ता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे सुपुत्र वीरधवल जगदाळे-पाटील यांच्या नेतृत्वात दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याबाबत बोलताना नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी सांगितले की, “दौंडला प्रथमच अशा महत्त्वाच्या पदावर प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि पायाभूत विकासालाही चालना मिळेल. आता ‘बारामती झकास आणि दौंड भकास’ ही म्हण बदलून ‘बारामती झकास आणि दौंड पण झकास’ अशी होईल, याबद्दल आम्ही आशावादी आहोत.”
तसेच, या निवडीमुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. दौंड तालुक्याच्या विकासासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करतील, अशीही प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
एकूणच, वीरधवल जगदाळे-पाटील यांच्या निवडीमुळे दौंडच्या विकासाला नवे बळ मिळणार असून, तालुक्याची ओळख बदलण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























