वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : नगरपालिकेमार्फत शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असतानाच या कामांमध्ये विरोधकांकडून अडथळे आणले जात असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांनी केला आहे. मंगळवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत शहराच्या विकासात राजकारण होत असल्याची खंत व्यक्त केली.
शहरातील विकासकामे चुकीच्या पद्धतीने व मनमानी कारभारातून केली जात असल्याचा आरोप नागरिक हित संरक्षण मंडळाच्या नगरसेवकांनी करत जिल्हाधिकारी कार्यालय व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही कामे थांबवण्याचे आदेश नगरपालिकेला मिळाले. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ च्या हद्दीत रस्त्यालगत झाडेझुडपे हटवण्याचे काम सुरू असताना त्यातही राजकारण करून ते काम बंद पाडले आल्याचा आरोप त्यांनी केला. “दौंडच्या विकासात अडथळे आणण्यासाठी विरोधक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यावरही आरोप करत सांगितले की, “मुख्याधिकारी ठराविक गटाच्या सांगण्यावरून काम करत आहेत. नगराध्यक्ष म्हणून दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसत आहे.”
कचरा व्यवस्थापनाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. “सध्या दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे १७ टन कचऱ्यासाठी दौंड नगरपालिका स्वतःची जागा घेऊन योग्य व्यवस्था करणार आहे,” असे नगराध्यक्षा जगदाळे -पाटील यांनी नमूद केले.
तसेच नगरपालिकेचा एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्प बंद असून, तेथील लाखो रुपयांची यंत्रसामग्री चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि बांधकाम यांसारख्या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले.
“आमचा एकच उद्देश आहे — दौंड शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे कल्याण. विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून विकासकामांना सहकार्य करावे. अन्यथा, नगराध्यक्ष म्हणून मला दिलेले अधिकार वापरण्यास मी मागे हटणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























