वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहरातील भिमनगर परिसरातील नागरिकांना उघड्या गटारीमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून या प्रश्नाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. भिमनगर येथील समाज मंदिरापासून एक मोठी गटार जात असून ती पूर्णपणे उघड्या स्वरूपात आहे. ही गटार मूळतः पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आली असली तरी त्यामध्ये सध्या मैलाचे व सांडपाणी सोडले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या गटारीमुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून विविध साथीच्या आजारांचा धोका देखील वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत अनेक वेळा दौंड नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच गटारीवर झाकण बसविण्याची आणि त्यामध्ये सोडले जाणारे मैलाचे पाणी तात्काळ बंद करण्याची मागणीही केली आहे. मात्र अद्याप या मागण्यांवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, उघड्या गटारीतून मैलाचे पाणी सोडणे तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा भिमनगर परिसरातील नागरिक स्वखर्चाने गटार बंद करण्याचा निर्णय घेतील आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील.
भिमनगर परिसरातील नागरिकांचा हा प्रश्न नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ दखल घेतली. कोणताही विलंब न करता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना “Do it as soon as possible” असे स्पष्ट निर्देश देत नागरिकांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
नगराध्यक्षांच्या या भूमिकेमुळे भिमनगर येथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरात लवकर गटारीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























