वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड — कोविड-१९ काळात बंद करण्यात आलेले दौंड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) वाहन परवाना शिबीर पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार कुल यांनी मुंबई येथे मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहर व तालुक्यातील नागरिकांना सध्या वाहन परवाना तसेच इतर RTO संबंधित कामांसाठी बारामती येथे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, विशेषतः ग्रामीण भागातील तरुण व वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
कोविड-१९ पूर्वी दौंड येथे नियमितपणे वाहन परवाना शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच नागरिकांची कामे सहजपणे पूर्ण होत होती. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही शिबिरे तात्पुरती बंद करण्यात आली होती. सध्याच्या घडीला परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली असली, तरीही ही शिबिरे अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी दौंड येथे वाहन परवाना शिबीर पुन्हा पूर्ववत आणि नियमित सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार कुल यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. स्थानिक पातळीवर RTO सेवा उपलब्ध झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल आणि प्रशासनावरचा ताण देखील कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार राहुल कुल यांच्या या मागणीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, दौंड आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी वाहन परवाना शिबीर लवकरच नियमित सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार कुल यांनी दिली.
दौंड तालुक्यातील नागरिकांना या निर्णयाची प्रतीक्षा लागून राहिली असून, शिबीर लवकरात लवकर सुरू झाल्यास स्थानिक स्तरावर मोठा दिलासा मिळणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























