वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : तालुक्यात १८ व १९ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत आमदार राहुल कुल यांनी महसूल व कृषी विभागाला त्वरित घटनास्थळी जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाला आजपासूनच शेतात उतरून प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
दौंड तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचा व गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला असून यवत, यवत स्टेशन, उंडवडी, खामगाव, खानोटे, पिलानवाडी, दहीटने आणि राहू या गावांमध्ये कांदा, भाजीपाला, फळबागा तसेच चारा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे.
याबाबत बोलताना आमदार कुल म्हणाले, “बळीराजावर आलेले हे संकट मोठे आहे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता राखून लवकरात लवकर अहवाल शासनाकडे सादर करावा. बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात केल्याने महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आता प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत आहेत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























